राजकारणात वापरला जाणारा पैसा, श्रीमंतांचा राजकीय प्रवेश त्यातून होणारे अनैतिक व्यवहार व व्यवहारात नागवला जाणारा सर्व सामान्य माणूस यामुळे निर्माण झालेली भयानक असमानता आणि जबरदस्तीने लादलेला भेदभाव देशातील गावागावांना एका मोठ्या उलथापालथीकडे घेऊन जात आहे. हे सत्य आहे की ही स्थिती फार दिवस टिकू शकत नाही. स्पष्ट आहे की आजचा धनिक समाज एका भयंकर ज्वालामुखीच्या तोंडावर बसून रंगरेल्या करत आहे आणि शोषकांचे निष्पाप लेकरं व कोट्यवधी शोषित लोक एका भयंकर दरीच्या कड्यावरून आज चालत आहेत.
समाजाचा प्रमुख घटक असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक अधिकारांपासून, विध्यार्थी वर्गाला चांगल्या व परवडणाऱ्या शिक्षणा पासून व शेताकऱ्यांना त्यांच्या अधिकारा पासून वंचित ठेवले जात आहे आणि त्यांच्या वाटेचे सगळे धन शोषक भांडवलदार वर्ग व त्यांची चाटू गिरी करणारे राजकीय नेते लाटून नेतात. दुसऱ्यांना अन्नदाता असलेले शेतकरी आज आपल्या परिवारासह दाण्या-दाण्यासाठी मोहताज झाले आहेत. याउलट समाजावरचे शोषक लोक क्षुल्लक कारणांसाठी लाखोंचा व्यवहार चुटकीसरशी उडवतात.
समाजातील लोकांना त्यांच्यावर होणारा अन्याय कळू नये कामगारांनी वाढलेल्या कामावर कामाच्या तासांवर बोलू नये आंदोलन करू नये, विध्यार्थी वर्गाने परवडणाऱ्या शिक्षणासाठी रस्त्यावर उतरू नये व शेतकऱ्यांने शेती संधर्भात आवाज उचलू नये म्हणून सर्वत्र जाती जाती मध्ये वाद लावून दिले जात आहे व मूळ समस्यांपासून व मूळ आंदोलना पासून त्यांना दूर ठेवले जात आहे.
नवतरुण वर्गाने आपले खरे शत्रू कोण हे ओळखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच या व्यवस्थेचा चकणाचूर होणार आहे. परंतु यासाठी नातेसंबंधांचे व पैसा आधारित राजकारण संपवून सत्य बाजू परखड पणे मांडणारे व गरीबाच्या न्याय हक्कासाठी लाठ्याकाठ्या झेलण्यास मागे न हटणारे नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे.